कटाळ्या घुसला ऊरुसाच्या गर्दीत
देशातील तिसऱ्या क्रमांकाचा दर्गाह
एकजण गंभीर तर २५ जण जखमी
वाहन जाण्यासाठी जागाच शिल्लक ठेवलेली नाही
उस्मानाबाद दि.९ (प्रतिनिधी) - उस्मानाबाद शहरात हजरत खॉजा शमशोद्दीन गाजी रहे. दर्गाह यांचा सुरू असलेल्या ऊरुस दरम्यान एकापाठोपाठ एक असे दोन मोकळे कटाळे बैल, (वळू) या ठिकाणी जमलेल्या नागरिकांच्या गर्दीत घुसल्याने त्याने २५ च्यावर भाविक जखमी केले असून त्यापैकी एका व्यापाऱ्यास हृदयविकाराचा झटका आला आहे. विशेष म्हणजे त्याच्या अंगावर भाजले असल्यामुळे तो अति गंभीर आहे. प्राथमिक उपचार जिल्हा रुग्णालयात केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यास सोलापूर येथील रुग्णालयात हलविले आहे. हा प्रकार दि.९ फेब्रुवारी रोजी पहाटे २.१५ वाजण्याच्या सुमारास घडला. यावेळी या महोत्सवातील मुख्य आकर्षण असलेला दर्ग्यावर चिरागा (दिवे) लावून पळणारा धार्मिक विधी करणारा व्यक्ती दिवे लावून पळत असताना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडल्यामुळे सर्वजणच गोंधळून गेले. या मोकळ्या कटाळ्याला आवारणे आवाक्याबाहेर झाल्यामुळे अनेकांची धांदल उडाली. त्यामुळे या परिसरात एकच गदारोळ निर्माण झाला. ही माहिती आरोग्य विभागाला समजतात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी क्षणाचाही विलंब न लावता लागलीच त्या ठिकाणी जाऊन सर्व जखमींची पाहणी करीत त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले.
उस्मानाबाद शहरात हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे. यांच्या ऊसानिमित्त धार्मिक कार्यक्रमाबरोबरच इतरही सामाजिक उपक्रम राबविले जातात. तर या परिसरात मोठे व छोटे पाळणे, मौत का कुऑ, ब्रेक डान्स, वेगवेगळ्या प्रकारच्या खेळणी व साहित्य विक्रीची दुकाने, हॉटेल्स आदींसह विविध प्रकारचे दुकाने थाटली गेली आहेत. मात्र त्यासाठी वक्फ विभागाच्यावतीने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन केले जात नाही. या परीसरात लावलेल्या स्टॉलमधून नागरिकांना येण्या-जाण्यासाठी आवश्यक असलेले १० फुटांचे अंतर ठेवलेले नाही. तसेच स्टॉल लावणाऱ्या व्यापाऱ्यांकडून ठराविक रक्कम आकारण्यासाठी ठरवून दिलेले दर न घेता त्याच्या १०० पटीने जास्तीची आकारणी केली गेली आहे.
-------------------------------------------------
प्रशासनाचा सावळा गोंधळ उरुसामध्ये प्रथमोपचार केंद्रच नाही
चिरागा या धार्मिक विधी दरम्यान आज पहाटे अडीच च्या दरम्यान वळू घुसल्याने गोंधळ होऊन १४ भाविक जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर प्रशासनाचा सावळा गोंधळ समोर आला आहे. कोणतीही यात्रा असेल तर भाविकांच्या सोयीसाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रथमोपचार केंद्र सुरू करणे अपेक्षित असते मात्र उरुसामध्ये कोठेच प्रथमापोचार केंद्र आढळून आले नाही. उस्मानाबाद येथील हा दर्गाह भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा दर्गाह असून लाखो भाविक या ऊरुसासाठी येत असतात. यात अबालवृद्धांचा समावेश असतो. आरोग्याबाबत काही समस्या निर्माण झाल्यास उरुसाच्या ठिकाणी प्रथमोपचार केंद्र असणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया भाविकांनी यावेळी बोलून दाखवली. याबाबत नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
उरुसामध्ये घडलेली घटना ही अनपेक्षित आहे. उरूस होणाऱ्या ठिकाणी करावयाच्या उपाययोजना बाबत सूचना केलेल्या आहेत. आमची एक टीम सायंकाळी ४ ते ९ वाजेपर्यंत उरुसामध्ये भेट देऊन देखरेख करत असते.
वृषाली तेलोरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
--------------------------------------------
रस्ताच नसल्याने झाली अडचण
या परिसरात व्यापाऱ्यांना लुटण्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त स्टॉल्स उभारले गेले आहेत. त्यामुळे रस्त्यासाठी आवश्यक असलेली जागाच शिल्लक ठेवली नाही. तर मोठ्या प्रमाणात बॅरिकेटिंग केल्यामुळे या परिसरात वाहन जाण्यास अडथळा आल्याने लावलेले बॅरिकेटिंग उपसून काढण्यास विलंब लागला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जखमींना अडचणींना तोंड द्यावे लागले.
--------------------------------------------