ना. सावंत यांनी खरीप हंगाम पूर्व बैठकीत बी बियाणे सह पीक कर्ज वाटपाचे दिले निर्देश
ना. सावंत यांनी खरीप हंगाम पूर्व बैठकीत बी बियाणे सह पीक कर्ज वाटपाचे दिले निर्देश
धाराशिव दि.२ (प्रतिनिधी) - आपला उस्मानाबाद जिल्हा कमी पर्जन्यमान असलेला क्षेत्र आहे. शेतकऱ्यांना पिकांसाठी पावसाळा संपल्यानंतर मुबलक पाणीसाठा उपलब्ध नसल्यामुळे जिल्ह्यात शेततळे तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करुन या मोहिमेचा चळवळीत रुपांतर करा असे निर्देश पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांनी दि.१ मे रोजी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरिप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी आ. ज्ञानराज चौगुले, आ. कैलास पाटील, जिपचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, निवासी उपजिल्हा अधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा शल्य चिकित्सक राजाभाऊ गलांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने, जिल्हा कृषी अधिकारी महेश तीर्थकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा उपनिबंधक सुनिल शिरापूरकर यांच्यासह सर्व विभागातील कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
यावेळी मंत्री सावंत यांनी ई-पीक पाहणी, खते, किटकटनाशके, बियाणे, कर्ज वाटप, शेततळे व इतर योजनांचा सविस्तर आढावा घेतला. शेततळे भविष्यात अत्यंत उपयोगी ठरणार असून यापूर्वी ज्या शेतक-यांनी शेततळे तयार केलेले आहेत. त्या सर्वांना तात्काळ अनुदान वितरीत करावा, जेणे करुन इतर शेतकरीही आपल्या शिवारात शेततळे तयार करतील. ई-पीक पाहणी संदर्भात पालकमंत्री म्हणाले तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवकांनी गांभीर्याने या कामाकडे लक्ष द्यावे, शेतक-यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन वस्तुस्थितीदर्शक आणि अचूक आकडेवारी घ्यावी. पिकांचे उत्पादनाबाबत बोलतांना पालकमंत्री म्हणाले कृषी विभागाकडून २० टक्के शेतकऱ्यांचा सर्व्हे घेतला जातो आणि त्या आधारावर जिल्ह्याची उत्पादन क्षमता गृहीत धरली जाते. प्रत्यक्षात बाजारत आलेला धान्य किंवा तसे न करता सर्व्हेची टक्केवारी वाढावी असे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्ह्यात निकृष्ट बियाणे, भेसळयुक्त खते आणि बनावट कीटकनाशक विक्री करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामामध्ये कृषी निविष्ठा दर्जेदार व रास्त दरात मिळण्याच्यादृष्टीने गुण नियंत्रणाच्या कामांना गती द्यावी. बोगस कंपन्यांविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करा तसेच प्रत्येक तालुक्यात अधिकाऱ्यांच्या भरारी पथकांची नेमणूक करून एका तालुक्याच्या पथकाने दुसऱ्या तालुक्यात जाऊन आकस्मिक भेट देऊन खते बियाणे व किटकनाशकांची तपासणी करावी असे आदेशही त्यांनी दिले. तसेच गोगलगाय, किडी आणि सोयाबीन पिकांवरील येलो मोझॅकवर प्रतिबंध करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्याचे नियोजन करा. याबाबत गावागावात मोठे होर्डींग आणि फ्लेक्स लावा शक्यतो त्यांच्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना पुढे करून त्यांच्या अनुभवातून इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यास प्रोत्साहित करा. यासाठी शेतकऱ्यांचे विशेष मेळावे घ्या, आणि उतकृष्ट व प्रगतशील शेतकऱ्यांचा बक्षीस देऊन सत्कार करा असेही त्यांनी सांगितले. तसेच डॉ.सावंत म्हणाले की, ज्या ठिकाणी एख्याद्या पिकांचे उत्पादन जास्त असेल त्या भागातील शेतकऱ्यांना ड्रोनच्या सहाय्याने फवारणी करण्यास प्रोत्साहित करावे. यावेळी पीक कर्ज वाटपाबाबत काही बॅंकांच्या भूमिकेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. ज्या बॅंक खरिप पिकांसाठी कर्ज वाटपाचे लक्षांक साध्य करत नाहीत आणि (CIBIL) सिबिल स्कोअरच्या नावाखाली कर्ज देण्यास टाळाटाळ करतील अशा बॅंकांविरुद्ध जिल्हा उपनिबंधका कार्यालयाने कार्यवाही प्रस्तावित करावी, याबाबत मी वित्त मंत्र्यांशी चर्चाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात कांदाचाळ, शेततळे, शेततळे अस्तरीकरणावर कृषी विभागाने काम करण्याची आवश्यकता असून या महत्वाच्या योजनांवर अधिक लक्ष केंद्रित करा असेही त्यांनी सांगितले.