उपकेंद्राचा २५ कोटी रुपयांचा विकास आराखडा करण्यात यावा - आ. राणाजगजितसिंह पाटील
उपकेंद्राचा २५ कोटी रुपयांचा विकास आराखडा करण्यात यावा - आ. पाटील
धाराशिव दि.१९ (प्रतिनिधी) - सारख्या आकांक्षीत जिल्ह्यामध्ये शिक्षणाचे अनन्य साधारण महत्व आहे. येथील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात स्वतंत्र विद्यापीठ व केंद्रीय विश्वविद्यालयाची मागणी करण्यात आली आहे. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रातील आवश्यक कामांसाठी विकास आराखडा तयार करण्यात यावा. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आ राणाजगजितसिंह पाटील यांनी दिले.
धाराशिव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी यावेळी कुलगुरू डॉ प्रमोद येवले, उपकेंद्र संचालक डॉ. प्रशांत दिक्षित, प्र.कुलगुरू प्रा.डॉ.श्याम शिरसाट, व्यवस्थापन परिषद सदस्य श्री.बसवराज मंगरूळे, डॉ.जी.बी.पाटील, कुलसचिव प्रा.डॉ.भगवान साखळे, सिनेट अधिसभा सदस्य देविदास पाठक, गौतम पाटील, प्रा.संजय कोरेकर, डॉ.सतीश गावित, नितीन जाधव, डॉ.सतीश कदम, ऍड, खंडेराव चौरे, युवराज नळे, डॉ.रमेश दापके, डॉ.जयसिंगराव देशमुख, प्राचार्य डॉ.सुनील पवार आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आ पाटील म्हणाले की, एनबीए नामांकनाप्रमाणे आवश्यक इमारत, क्रीडांगण व ऑडिटोरियम बांधकामासाठी २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याच्या सूचना आ. पाटील यांनी दिल्या. मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये हा अतिशय संवेदनशील जिल्हा होता. येथील अनेक स्वातंत्र्यविरांनी या लढ्यामध्ये मोठे योगदान दिलेले आहे. त्यामुळे या अमृत महोत्सवी वर्षात मराठवाडा मुक्तिसंग्रामावर रिसर्च सेंटर विद्यापीठात सुरू करता येणे शक्य आहे का ? याबाबत विचार करावा असे त्यांनी सांगितले. तर ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी यशवंतराव उर्फ बुबासाहेब जाधव यांची जीवन साधना या पुरस्कारासाठी विद्यापीठाने केलेली निवड अतिशय सार्थ असून त्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आपल्या सर्वांच्या सहकार्याने धाराशिव येथे उपकेंद्र सुरू असून राज्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात एमआयडीसीकडील जमीन उपकेंद्रासाठी दिल्याच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. येथील शैक्षणिक चळवळीला गती देण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठाची मागणी कायम असून केंद्रीय विश्व विद्यालयाची देखील मागणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्राध्यापक, अधिकारी कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.