रस्ते हे विकास वाहिन्या असल्याने दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बनविणार पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांचे आश्वासन
रस्ते हे विकास वाहिन्या असल्याने दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बनविणार
पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत
धाराशिव दि.१४ (प्रतिनिधी) - रस्ते चांगले असले की चांगली सुविधा निर्माण होण्यास मदत होते. रस्ते हे विकास वाहिन्या असल्याने ते दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बनविणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी दिले.
भूम तालुक्यातील आंबी येथे पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत राज्य महामार्ग २१० ते अंबी -जयवंत नगर - जांब- विजयनगर या ९ किलो मीटर रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, जिल्हा परिषद माजी सभापती दत्ता साळुंखे, उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे, तहसिलदार भूम यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आज या रस्त्याचे भूमिपूजन केले असल्याचे सांगून प्रा.डॉ.सावंत म्हणाले की,लवकरच हा रस्ता दर्जेदार आणि मजबूत बनविण्यात येणार आहे.त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्या ग्रामीण जनतेचे शहराशी दळणवळण सुधारण्यास मदत तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सोय होईल. तसेच कृषी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होईल व रुग्णालयात तातडीने जाता येईल.गावाच्या विकासासाठी केलेल्या मागण्या पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत.या ठिकाणी रस्त्याची कामे असो किंवा पुलाचे काम असो येथील स्थानिक नागरिकांनी व सुजान जनतेने काम दर्जेदार व्हावेत यासाठी स्वतः निरीक्षण करावे असे पालकमंत्री डॉ. सावंत यावेळी म्हणाले.
भूमिपूजन कार्यक्रमानंतर पालकमंत्री प्रा.डॉ. सावंत यांनी स्थानिक पोलीस स्टेशनलाही भेट दिली. यावेळी त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
पोलीस कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या शासकीय निवासस्थानाचीही पाहणी केली. ही निवासस्थाने व्यवस्थित आणि दुरुस्त करून घेण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाला विविध विभागातील अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.