पशु संवर्धन अधिकाऱ्यांनी पशु पालक शेतकऱ्यांच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न करावेत - डॉ. भिकाणे एक दिवशीय तांत्रिक कार्यशाळेस प्रतिसाद
पशु संवर्धन अधिकाऱ्यांनी पशु पालक शेतकऱ्यांच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न करावेत - डॉ. भिकाणे
एक दिवशीय तांत्रिक कार्यशाळेस प्रतिसाद
धाराशिव दि.५ (प्रतिनिधी) - शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करतात. मात्र या पशुंना रोगावर नियंत्रण करण्यासाठी मोठा आर्थिक खर्च करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. हे टाळण्यासाठी पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवून शेतकऱ्यांना बळकटीकरण करण्याचे काम करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन नागपूर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ अनिल भिकाणे यांनी दि.५ ऑगस्ट रोजी केले.
धाराशिव जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत यशवंतराव चव्हाण सभागृहात एक दिवसीय तांत्रिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल शिंदे, उदगीर येथील पशु चिकित्सक पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ रविराज सुर्यवंशी, शेतकी व्यवस्थापक डॉ प्रफुल्लकुमार पाटील, सहाय्यक प्राध्यापक डॉ रविंद्र जाधव, धाराशिव येथील जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. यतिन पुजारी, उपायुक्त डॉ गौरीशंकर हुलसुरे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ भिकाणे म्हणाले की, पशु संवर्धन अधिकाऱ्यांनी दूध, मास व अंडी उत्पादनासह चिलींग प्रक्रिया, मार्केटिंग आदी मूल्यवर्धित क्षेत्रात नवीन युवकांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. पशु संवर्धन खात्यासारखे इतर कोणत्याही खात्याचा विस्तार होऊ शकत नाही. शेतकऱ्यासह पशुपालक यांच्यापर्यंत सहज विविध योजनांची माहिती देता येते. मोठ्या शेतकऱ्या ऐवजी लहान लहान शेतकरी व पशुपालकांना उद्योग उभा करण्यासाठी या विभागाच्या योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन केल्यास त्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी नक्कीच मदत होईल. मात्र त्यासाठी काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तर शेतकरी व पशु पालकांनी गाय, म्हैस याबरोबरच शेळी व कुक्कुट पालन करावे असे आवाहन केले. यावेळी पशु संवर्धन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लंपी रोगावर मात करून ती साथ आटोक्यात आणली. त्याबद्दल डॉ यतिन पुजारी, डॉ अभिजीत सोनवणे, डॉ सुवर्णा इंगोले, डॉ महेश मोरे, डॉ दिपक कदम, डॉ संजय कौडुंभरे, डॉ जितेंद्र पाटील, डॉ अमरदीप कांबळे, डॉ सुलेमान दायमी, लक्ष्मी दिवटे, संतोष गाडे, संगिता दुधभाते, विद्युल्लता कुलकर्णी, अरुणा माने, निर्मला गवळी यांच्यासह इतरांना लंपी योध्दा म्हणून सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्रवीण पतंगे व गोफणे यांनी तर प्रास्ताविक डॉ यतिन पुजारी यांनी व आभार डॉ दिपक कदम यांनी मानले. यावेळी अधिकारी, कर्मचारी व पशु पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
............................................
पशुंना रोग झाल्यानंतर इलाज करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. तो खर्च टाळून उत्पादन वाढविण्यासाठी प्रत्येक पशु पालकांनी आपल्या पशुंना नियमित लसीकरण करणे गरजेचे आहे. जर पशु गाभण असेल तरीदेखील लस करावीच. तसेच पुरी व घटसर्प याचे लसीकरण केले जाते. तर शेळीला घट सर्प लस देत नाहीत. ती न दिसल्यामुळे पीपीआर रोगाने शेळ्या मरतात. त्यामुळे शेळींना गाभण असताना देखील घट सर्पची लस देऊन त्यांचा मृत्यू टाळावा. त्यामुळे पशुंना लसीकरण वाढविण्याचा प्रयत्न करावा. तसेच जनावरांच्या अंगावर गोचीड मरावे त्यासाठी कीटक नाशकांची फवारणी टाळल्यास सेंद्रिय दूध मिळेल असे डॉ भिकाणे यांनी सांगितले.