रेल्वे मार्गासाठी संपादीत जमीनीला जास्तीत जास्त मावेजा मिळवून देणार असल्याचे आश्वासन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिले आहे
रेल्वे मार्गासाठी संपादीत जमीनीला जास्तीत जास्त मावेजा मिळवून देणार - आ. पाटील
धाराशिव दि.२९ (प्रतिनिधी) - धाराशिव-तुळजापूर- सोलापूर रेल्वे मार्गासाठी संपादीत केल्या जात असलेल्या जमीनीच्या दराबाबत शेतकऱ्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला असुन तो दुर करत संपादीत जमीनीला प्रचलीत शासकीय निकषांचा योग्य वापर करुन जास्तीत जास्त मोबदला मिळवून देण्याचा विश्वास आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर येथील जनता दरबारामध्ये शेतकऱ्यांना दि.२९ ऑगस्ट रोजी दिला.
महायुतीचे सरकार शेतकरी हिताचे असल्याने शेतकऱ्यांना हक्काचा जास्तीत जास्त मावेजा मिळवून देण्यासाठी प्रयत्न आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बागायती स्वरूपाच्या असतील अशा शेतकऱ्यांचे व्यवस्थित पंचनामे करून त्यांना देखील जास्तीत जास्त मावेजा मिळवून देऊ असे आश्वासन त्यांनी दिले. तालुक्यातील जनतेच्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी आ. पाटील यांनी आयोजित केलेल्या तुळजापूर येथील जनता दरबारसाठी शहरातील व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित असणाऱ्या नागरीकांचे तहसील, पंचायत समिती, कृषी कार्यालय येथील विविध विषय मार्गी लावण्यात आले. तसेच
तुळजापूर शहरातील स्थानिक पुजारी, व्यावसायिक व नागरिक यांना विश्वासात घेऊनच शहराचा विकास करण्यात येईल. तर आगामी काळात तुळजापूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विरोधकांच्या चुकीच्या प्रचारास किंवा प्रसारास बळी न पडता तुळजापूर शहरात होत असलेल्या विकासाला पाठिंबा देण्याचे त्यांनी आवाहन केले. तुळजापूर शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे हाती घेण्यात आले आहेत. तर पुढील काळात देखील शहर व तालुक्यातील गावांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर होऊन विविध प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले, राजकुमार पाटील, यशवंत लोंढे, चित्तरंजन सरडे, विलास राठोड, अरविंद पाटील,सिद्धेश्वर कोरे, दयानंद मुडके आदींसह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.