विकास कामे जनतेपर्यंत पोहोचविणे हाच शासनाचा मानस - पालकमंत्री प्रा.डॉ. सावंत
विकास कामे जनतेपर्यंत पोहोचविणे हाच शासनाचा मानस - पालकमंत्री प्रा.डॉ. सावंत
पांढरेवाडीत विकासकामाचे भूमिपूजन व लोकार्पण
धाराशिव दि.१४ (प्रतिनिधी) - विकास कामे जनतेच्या दारापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हे शासन काम करत आहे. जवळजवळ साडेचार कोटीच्या विकास कामाचे आज आपल्या गावात लोकार्पण व भूमिपूजन झालेले आहे. ही कामे दर्जेदार होणार असून शासन कायम आपल्याबरोबर आहे असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांनी दि.१४ ऑगस्ट रोजी केले.
परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथे विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री डॉ.सावंत बोलत होते.
यावेळी त्यांच्या हस्ते जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन २५ : १५ अंतर्गत मंजूर व काम पूर्ण रस्त्याचे लोकार्पण तसेच काम पूर्णत्व झालेल्या सभागृहाचे लोकार्पण व विविध कामाचे भूमिपूजन देखील करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती दत्ता साळुंखे, उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे आदी उपस्थित होते. पुढे पालकमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले की, जिल्हाभरातील प्रत्येक गावात दहन, दफनभूमी किंवा स्मशानभूमी उपलब्ध करून दिली जाणार आहे. जन सुविधे अंतर्गत पायाभूत सुविधा, पाणी व रस्ते याचा समावेश असणार आहे. गाव तिथे स्मशानभूमी १०९ टक्के उपलब्ध करून देणारा उस्मानाबाद-धाराशिल हा राज्यातील पहिलाच जिल्हा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गावातील इतर रस्ते ज्यांची मागणी आपण निवेदनानुसार केलेली आहे तेही लवकरच पूर्ण करणार असून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. दिवाळीपूर्वी ही सर्व कामे दर्जेदार व्हावी. सुदैवाने या गावाला पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तथापि विजे अभावी शेतीला पाणी देण्यास शेतकरी बांधवाला अतिशय कसरत करावी लागत आहे किंवा पाणी नसल्याने बरीच पिके पाहिजे तशी उत्पन्न देत नाही. त्यामुळे या ठिकाणी मंजूर असलेले ३३ के.व्ही. सबस्टेशन तात्काळ पूर्ण करण्याचेही अधीक्षक अभियंता यांना निर्देश दिले असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.