किलज साठवण तलावातील जमिनीचा मावेजा मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण वयोवृद्ध शेतकऱ्यांची कृष्णा खोरे विभागाकडून फरपट
किलज साठवण तलावातील जमिनीचा मावेजा मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
वयोवृद्ध शेतकऱ्यांची कृष्णा खोरे विभागाकडून फरपट
धाराशिव दि.२१ (प्रतिनिधी) - तुळजापूर तालुक्यातील किलज साठवण तलावामध्ये गेलेल्या जमिनींचा वाढीव मावेजा गेल्या ८-९ वर्षापासून मिळालेला नाही. तो मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मध्यम प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर दि.२१ ऑगस्ट रोजी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, वयोवृद्ध शेतकऱ्यांची फरपट सुरू असून आम्हाला नक्की न्याय मिळणार कधी ? असा प्रश्न शेतकरी विचारीत आहेत.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, तुळजापूर तालुक्यातील किलज साठवण तलावामध्ये येथील ३५ शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. त्यापैकी १७ शेतकऱ्यांचे निधन झाले आहे. तर उर्वरित वयोवृद्ध शेतकरी गेल्या ८-९ वर्षापासून या कार्यालयाकडे हे हेलपाटे मारीत आहेत. दि.९ ऑगस्ट रोजी संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी पुढील १० दिवसांमध्ये तुमचा मावेजा मिळेल असे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापपर्यंत मावेजा न मिळाल्यामुळे वयोवृद्ध शेतकऱ्यांनी या कार्यालयासमोर पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. यामध्ये महादेव बारले, आयुब शेख, सुभाष माने, मारुती कुठार, जमीर शेख, वसंत गायकवाड, नागनाथ बावकर, लक्ष्मण शिंदे, भगवान बारले, शिवाजी सोमवंशी, महादेव कापसे, सुधाकर भोईटे आदी शेतकरी उपोषणाला बसले आहेत.