धाराशिव नामांतराबद्दल आ पाटील यांनी सरकारचे मानले आभार
धाराशिव नामांतराबद्दल आ पाटील यांनी सरकारचे मानले आभार
धाराशिव दि.१६ (प्रतिनिधी) - मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने धाराशिव व छत्रपती संभाजीनगर नामकरणाचे राजपत्र प्रकाशित केल्याबद्दल महायुती सरकारचे मनःपूर्वक धन्यवाद. मागील अनेक वर्षांपासून मराठवाड्यातील जनतेची ही मागणी होती. राज्य सरकारने धाराशिव नामांतरासाठी राजपत्र काढून त्याची अंमलबजावणी केल्यामुळे आमदार पाटील यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
मराठवाड्याच्या सर्वंकष विकासाचा विचार करून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये रुपये ५९ हजार कोटी मंजूर करण्यात आले आहेत. धाराशिवच्या अर्थकारणाला नवी दिशा देणाऱ्या तुळजापूर विकास आराखडयासाठी रुपये १३२८ कोटी जाहीर करण्यात आले असून जिल्हावासियांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा विषय मार्गी लावण्यात आला आहे. दळणवळणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण लातूर-बार्शी-टेंभुर्णी मार्गाचे चौपदरीकरण, तुळजापूर तालुक्यात शेळी समुह योजना राबविणे यासह मराठवाड्यातील सिंचन, कृषी, पायाभूत सुविधा, पर्यटन या क्षेत्रात विकास कामांसाठी भरीव निधी देण्यात आला आहे. तर कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, सोलापूर - धाराशिव - तुळजापूर रेल्वे, १० हजार रोजगार निर्मितीची क्षमता असलेल्या तांत्रिक वस्त्रनिर्मिती यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी यापूर्वीच निधी मंजूर करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.