कंत्राटी वीज कामगारांचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण
कंत्राटी वीज कामगारांचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण
धाराशिव दि.९ (प्रतिनिधी) - थकीत वेतनासह विविध प्रलंबित मागण्यासाठी कंत्राटी वीज कामगारांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आमरण उपोषण सरू केले आहे. दि.९ सप्टेंबर रोजी दुसर्या दिवशीही या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे कंत्राटी वीज कामगारांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
धाराशिव जिल्ह्यात विविध ३ एजन्सीमार्फत कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यातील अजुभाई इलेक्ट्रीकल्स छत्रपती संभाजीनगर या एजन्सीमार्फत परंडा, भूम व तेर उपविभागात कंत्राटी कामगार नियुक्त करण्यात आलेले आहेत. या कामगारांना जून, जुलै व ऑगस्ट महिन्याचे वेतन मिळालेले नाही. आंदोलन सुरू करणार असल्याचे समजल्यानंतर एक महिन्याचे वेतन देण्यात आले. परंतु उर्वरित वेतन अद्याप न मिळाल्यामुळे कंत्राटी वीज कामगारांनी अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या एजन्सीने कंत्राटी वीज कामगारांना अद्याप नियुक्तीपत्र दिलेले नाही. तसेच परंडा उपविभागामध्ये वाढीव रक्कम घेऊन अनुभव नसणार्या कामगारांना नियुक्तीपत्र देऊन कामावर कार्यरत असलेल्या सुमारे ३० कामगारांना जाणीवपूर्वक कामावरुन कमी केले असल्याचा आरोप कंत्राटी वीज कामगार संघटनेने केला आहे. त्यामुळे या एजन्सीचे कंत्राट रद्द करण्यात यावे अशी मागणीही उपोषणकर्त्यांनी केली आहे. या आंदोलनात कंत्राटी वीज कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मारुती गुंड, उपाध्यक्ष सुशील उपळकर, परंडा तालुकाध्यक्ष दिनेश सांगडे यांच्यासह कंत्राटी वीज कामगार ज्ञानेश्वर माने, रमजान मोगल, गोपीनाथ इटकर, धर्मराज शेळवणे, तानाजी शेळवणे, दत्ता साळुंके, समाधान उगले, हनुमंत अंधारे, हणमंत समिंदर, ज्ञानेश्वर लिमकर, बालाजी साबळे, ज्ञानेश्वर जानकर, अशोक मगर, अतुल अनुसे, विशाल भोगील, भागवत हेगडकर यांच्यासह इतर सहभागी झाले आहेत.