गाथा मुक्ती संग्रामाची नाट्य प्रयोगास उत्स्फूर्त प्रतिसाद
गाथा मुक्ती संग्रामाची नाट्य प्रयोगास उत्स्फूर्त प्रतिसाद
तुळजापूर दि.२६ (प्रतिनिधी) - मराठवाडा काय होता.. इथे निजामशाही कशी आली.. त्या निजामशाहीच्या काळात काय परिस्थिती होती. त्या हुकूमशाही विरोधात जो लढा उभा राहिला, तो कसा उभा राहिला आणि अखेर १७ सप्टेंबर १८४८ रोजी हा मराठवाडा निजामशाहीच्या जोखडातून मुक्त झाला. याचा चित्त थरारक इतिहास गाथा मुक्तीसंग्रामाची या नाट्य प्रयोगाद्वारे दाखविण्यात आला. यावेळी तुळजापूर येथील नाट्य रसिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचलनाच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गाथा मुक्ती संग्रामाची या नाटकाचे आयोजन धाराशिव जिल्ह्यातील ८ तालुक्यात करण्यात आले आहे.
या नाटकाचा पहिला प्रयोग सोमवारी 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी पूजारी मंगल कार्यालयात संपन्न झाला. यावेळी अपर तहसिलदार स्वप्नील ढवळे, गट शिक्षण अधिकारी मेहरूनिसा इनामदार, मंडळ अधिकारी अमर गांधले, नेमचंद शिंदे, तलाठी अशोक भानभागे, वंचित बहुजन आघाडीचे मिलिंद रोकडे, जिल्हा समनव्यक विशाल शिंगाडे, या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. या नाटकाचे लेखन डॉ.सतीश साळुंके व शैलेश गोजमगुंडे यांनी तर डॉ.गणेश चंदनशिवे यांनी दिग्दर्शन केले आहे. यातील कलाकारांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील आठवणींना उजाळा दिला. अभिनयाचे सादरीकरण पाहताना प्रेक्षकही भारावून गेले होते. अप्रतिम अभिनयाद्वारे कलाकारांनी पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, वेदप्रकाश आर्य, निजाम, कासीम रजवी, माणिकचंद पहादे, पांडू हजाम यांच्या भूमिका जिवंत केल्या. प्रत्येक संवादाला मिळणारी दाद जणू कलाकारांना रसिकतेची पोहोचपावतीच देऊन गेली. यावेळी तुळजापूर तालुक्यातील शासकीय अधिकारी- कर्मचारी, विविध संस्थाचे पदाधिकारी, महिला, पुरुष, तुळजाभवानी सैनिकी स्कुलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या नाट्य प्रयोगाच्या यशस्वितेसाठी विशाल टोले, सागर चव्हाण, सुगत सोनवणे, तन्मय शेटगार, आकाश वाघमारे, अशोक घोलप, बाहेर शेख, सुमित शिंगाडे, सौरभ शिंगाडे, अजय चिलवंत यांनी परिश्रम घेतले.