छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जनजागरण यात्रेचे आयोजन
छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जनजागरण यात्रेचे आयोजन
धाराशिव दि.३० (प्रतिनिधी) - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक व विश्व हिंदू परिषदेच्या ६० व्या वर्षानिमित्त जिल्ह्यातील ४३ गावातून शौर्य जनजागरण यात्रा काढण्यात येणार आहे.
या यात्रेचा शुभारंभ उमरगा तालुक्यातील अचलबेट येथे दि.१ ऑक्टोबर रोजी तर दि. ७ ऑक्टोबरला धाराशिव येथे समारोप होणार आहे. या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचे अलौकिक कर्तृत्व, शौर्याचा इतिहास याबद्दल मांडणी करून शिवरायांचे तेजस्वी तेज नागरिकांसमोर मांडून त्यांच्या आदर्श राज्याचा प्रजाहितदक्ष शिवकाळ व स्वराष्ट्र स्वभाषा स्वधर्म याविषयी केलेले अतुलनीय कार्य याविषयी माहिती दिली जाणार आहे.
धाराशिव शहरातील व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयात दुपारी १२ वाजता या यात्रेचा समारोप होणार आहे. या यात्रे दरम्यान आकर्षक रथ तयार करण्यात आला असून या रथावर छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासना रूढ भव्य दिव्य प्रतिमा व त्यांच्या कार्याची माहिती देणारे चित्रकृती असणार आहेत. तसेच प्रत्येक गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणादायी माहिती जनतेसमोर मांडून हा जाज्वल्य इतिहास पुढे नेण्यासाठी नागरिकांनी प्रखर राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती अंगी बाळगून देव, देश व धर्मासाठी सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. या यात्रेत नागरिकांनी सहभागी होऊन यात्रा यशस्वी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.