सरकारला सद्बुद्धी मिळावी यासाठी स्वाभिमानी व पुजारी मंडळाचे जगदंबेकडे साकडे
सरकारला सद्बुद्धी मिळावी यासाठी स्वाभिमानी व पुजारी मंडळाचे जगदंबेकडे साकडे
तुळजापूर दि.१८ (प्रतिनिधी) - राज्यातील शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्याची बुद्धी महाराष्ट्र सरकारला मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व पुजारी मंडळाच्यावतीने कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेला साकडे घालण्यात आले. तर महाद्वारसमोरील कासवाचे पूजन करीत महाआरती करुन सरकारला सदबुद्धी मिळावी म्हणून दि.१८ सप्टेंबर रोजी प्रार्थना करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत सरकारने घोषणांचा पाऊस पाडला. परंतू शेतकर्यांच्या शेतीमालाला हमीभाव, ज्वारी, तूर, सोयाबीनचा प्रश्न, पशुधनाचा प्रश्न, दुधाला दरवाढ, पिण्याचे पाणी अशा अनेक समस्या आहेत. पावसाने ओढ दिल्यामुळे पिके वाया गेली आहेत. त्यामुळे शेतकर्यांना २५ टक्के अग्रीम मिळणे अपेक्षित होते. परंतू सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. राज्य सरकार हे मोसमाप्रमाणे बदलत असून एका वर्षात चारवेळा सरकार बदलत आहे. त्यामुळे शेतकर्यांचे प्रश्न सोडवून त्यांना दिलासा देण्याची सद्बुद्धी सरकारला द्यावी यासाठी श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी साकडे घातल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी सांगितले. यावेळी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनीही सरकारच्या धोरणावर कडाडून टिका केली.