भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम प्रामाणिकपणे करावे - कांबळे
भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम प्रामाणिकपणे करावे - कांबळे
धाराशिव दि.१० (प्रतिनिधी) - देशातील दलित, वंचित, शोषित व अपेक्षित समाजासाठी देशातील केंद्र सरकारचे मोठे योगदान असल्याचे मत भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कांबळे यांनी दि.१० सप्टेंबर रोजी व्यक्त केले.
भारतीय जनता पार्टी अनुसुचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रतिष्ठान भवन भाजपा कार्यालयात संघटनात्मक बैठक घेण्यात आली. यावेळी कांबळे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबदल त्यांचा भाजपच्यावतीने सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, अनुसुचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रविण सिरसाठे, दत्ता पेठे, सचिन लोंढे, विधा माने, अमोल पेठे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना कांबळे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दलित, वंचित, शोषित, उपेक्षित व आदिवासी समाजासाठी लोक कल्याणकारी योजना राबवल्या. तरुणांना उद्योग, व्यवसायासाठी विविध शासकीय योजनांतून कर्ज उपलब्ध करुन दिले जात आहे. तर प्रधानमंत्री आवास योजनेतून देशभरात ३ कोटीपेक्षा जास्त घरे उपलब्ध झाली आहेत. तसेच रमाई आवास योजनेतून देखील असंख्य लोकांना घरकुलाचा लाभ मिळत आहे. केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनातून देशातील गरिबांना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी
नितीन काळे, अस्मिताताई कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.