येरमाळा, इटकूर वीज कंपनीच्या परंडा शाखेला जोडण्यात येऊ नये - दुधगावकर
येरमाळा, इटकूर वीज कंपनीच्या परंडा शाखेला जोडण्यात येऊ नये - दुधगावकर
धाराशिव दि.३० (प्रतिनिधी) -
कळंब तालुक्यातील येरमाळा व इटकूर या गावामध्ये असलेल्या महावितरण वीज कंपनीच्या शाखा धाराशिव कार्यालयाशी जोडलेल्या आहेत. परंतू नव्याने अस्तित्वात आलेल्या परंडा विभागीय कार्यालयाशी येरमाळा व इटकूर जोडण्याचा निर्णय महावितरण कंपनीने इटकूर येरमाळा गावातील लोकप्रतिनिधी व जनता यांना विचारात न घेता त्यांच्याशी चर्चा न करता परस्पर घेतला आहे. त्यामुळे
येरमाळा व इटकूर वीज कंपनीच्या शाखा परंडा शाखेला जोडण्यात येऊ नयेत. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगाकवर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे दिला आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, येरमाळा व इटकूर येथून परंडा विभागीय कार्यालय जवळपास ८० ते ८५ कि.मी. तर धाराशिव कार्यालय ५५ ते ६० कि.मी. अंतरावर आहे. या दोन्ही गावातील जनतेला परंडा विभागीय कार्यालयापेक्षा धाराशिव कार्यालय जवळचे व सोयीचे असल्यामुळे महावितरण कंपनीने घेतलेला निर्णय रद्द करावा. तर पूर्वीप्रमाणे धाराशिव विभागीय कार्यालय कायम ठेवण्यात यावे. तसेच महावितरण कंपनीने १५ डिसेंबर २०२० रोजी कळंब तालुक्यातील शिराढोण येथील सुरज प्रकाश मुंदडा गट क्रं.२६४ व प्रकाश नारायणदास मुंदडा गट क्रं.२५९ यांच्याकडून प्रत्येकी ११ हजार रुपये भरुन HVDS IN AGHVDS या योजनेमध्ये पैसे भरुन ३ वर्षाचा कालावधी झालेला आहे. परंतू त्यांच्या मागणीप्रमाणे डी.पी. बसविण्यात आलेला नाही. ते काम अर्धवट ठेवण्यात आलेले आहे. याविषयी वारंवार संबंधित महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता आम्हाला माहिती नाही. गुत्तेदाराकडे काम आहे. त्यामुळे त्यांना बोला अशी उडवा-उडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. मुंदडा यांच्यासह जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची कामे अर्धवट अवस्थेत असून ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत व वीज वितरण कंपनीतील सावळा गोंधळ थांबविण्यासाठी संबंधितास आदेशीत करावे. अन्यथा वीज महावितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दुधगांवकर यांनी दिला आहे.