सन्मानाने जगण्यासाठी शैक्षणिक संस्कार गरजेचे - नायगावकर
सन्मानाने जगण्यासाठी शैक्षणिक संस्कार गरजेचे - नायगावकर
धाराशिव दि.१९ (प्रतिनिधी) - विद्यार्थ्यांनी राष्ट्रसेवेसाठी आपले कर्तव्य काय आहे हे जाणून घेतले पाहिजे व आरोग्य सुदृढ ठेवलं पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्याना व्यायाम शाळा उपलब्ध करून द्यावी. विद्यार्थ्यांना सन्मानाने जगण्यासाठी शैक्षणिक संस्कार गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक भास्करराव नायगावकर यांनी व्यक्त केले.
धाराशिव शहरातील राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व आदर्श प्राथमिक विद्यालयात हैद्राबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सव दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा शशिकलाताई घोगरे या होत्या. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. अविनाशराव देशमुख, प्राचार्य पी.एन. पाटील, आदर्श प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक एन.व्ही. शिंदे, उपप्राचार्य एन.एम. देटे, पर्यवेक्षक बाळासाहेब मुंडे व व्ही.के. देशमुख आदी उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष विधीज्ञ देशमुख यांनी भाई नरसिंगराव देशमुख व उद्धवराव पाटील यांचे विचार जीवनात अंगीकार करत स्वातंत्र्य संग्रामात प्राणांची आहुती दिलेल्या शहिदांचे स्मरण करत त्यांनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य अबाधित राखले जावे यासाठी आपल्या क्षमतांचा वापर करणे आवश्यक आहे असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आलेख नेहमी उंचावत असून विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवावा असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा शशिकलाताई घोगरे केले.
हैद्राबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सवीनिमित्त दि.१५ सप्टेंबर रोजी निबंध, वक्तृत्व, चित्रकला आणि हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या. त्याचे बक्षीस वितरण करण्यात आले. हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांची भाषणे, गीत गायन, चित्र प्रदर्शन असे विविध उपक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य पी.एन. पाटील यांनी तर सूत्रसंचालन आर.आर. लोकरे व एस.एस. शेळके यांनी व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख व्ही.डब्ल्यू. देशमुख यांनी मानले. कार्यक्रमास प्रशालेचे शिक्षक, नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.