शेतात अस्थिविसर्जन करून लावली झाडे
धाराशिव दि.१५ (प्रतिनिधी) - कळंब तालुक्यातील आंदोरा येथील शेतकरी माणिकराव तांबारे यांचे दि.९ सप्टेंबर रोजी मिरज येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना निधन झाले होते.
त्यांच्या पार्थिवावर गावी शेतात अंत्यविधी केल्यानंतर दि.११ सप्टेंबर रोजी सावडण्याचा कार्यक्रम पार पडला. यानंतर या हस्ती कुठेही बाहेरगावी देवस्थानच्या ठिकाणी नदीत विसर्जित न करता शेतात ५ झाडे लावून त्या झाडाच्या खड्ड्यात विसर्जित करण्यात आल्या. अशा प्रकारे जुन्या अंधश्रद्धा रुढी परंपरा यावर न विश्वास ठेवता घरातील सर्वांनी व नातेवाईकांनी हा निर्णय घेतल्यामुळे परिसरातील हा चर्चेचा विषय झाला आहे. आपण आपल्या माणसाला स्मृतीत ठेवण्यासाठी झाडे लावून ती वाढविल्यानंतर निसर्गाचे संवर्धन होते. तसेच ती रक्षा नदीत व इतर ठिकाणी टाकल्यास त्याचे प्रदूषण होऊन निसर्गाचा समतोल बिघडतो. याचा त्रास सर्वांनाच होतो. या गोष्टीचा विचार करून अशा अनिष्ट चालीरीतीवर विश्वास न ठेवता नवीन पायंडा नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. माणिकराव तांबारे हे डॉ.संदीप तांबारे यांचे वडील होते. डॉ तांबारे गेल्या अनेक वर्षापासून व्याख्यान, प्रबोधन व समाजपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून समाजकार्यात सक्रिय आहेत. व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात त्यांना जागतिक नामांकन मिळालेले आहे. त्यामुळे जैसा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या उक्तीप्रमाणे फक्त प्रबोधन न करता ते आचरणात आणण्याचे काम करत आहेत. तसेच १० वा व १३ वा ही कुठेही बाहेरगावी अथवा देवस्थानच्या ठिकाणी न जाता झाडाची पूजा करून करणार असल्याचे डॉ.तांबारे यांनी सांगितले.