जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील - ना. सावंत
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील - ना. सावंत
धाराशिव दि.१८ (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्याबरोबरच शासनाच्या विविध योजनांचा लाभ देख नागरिकांना मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी दि.१७ सप्टेंबर रोजी दिले.
हैद्राबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सवाच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ राणाजगजितसिंह पाटील, स्वातंत्र्य सैनिक भास्करराव नायगांवकर, बुबासाहेब जाधव, कलावती उंबरे, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी महादेव किरवले, उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, संतोष भोर, राजकुमार माने, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश हरिदास, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. सावंत म्हणाले की, १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत सर्व आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. तर रक्तदान व अवयवदान याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येईल. तसेच १३ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत सर्व आरोग्य संस्थांमध्ये आरोग्य मेळावे व सर्व गावांतून आयुष्मान ग्रामसभा आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तर सर्व नागरिकांचे डिजिटल आरोग्य अकाऊंट (आभा कार्ड) काढण्यात येतील. अंगणवाडी व शाळांमध्ये ० ते १८ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत धाराशिव जिल्ह्यातील विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासाच्या अनुषंगानेही निर्णय घेण्यात आले. तर तुळजाभवानी मंदिरासाठी १ हजार ३२८ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला. तसेच माणकेश्वर येथील महादेव मंदिर, तेर येथील संत गोरोबा काका मंदिर या मंदिरांच्या विकासासाठीही भरीव निधी मंजूर करण्यात आला. तसेच तुळजापूर तालुक्यात शेळीसमूह योजना राबविण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी हैद्राबाद मुक्ती संग्राम स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. तर हुतात्म्य प्राप्त झालेल्या शहिदांना जिल्हा पोलीस दलातर्फे बंदुकीच्या फैरी हवेत झाडून मानवंदना देण्यात आली. तर सावंत यांच्या हस्ते स्वतंत्र्य सैनिक भास्कर नायगांवकर, बुबासाहेब जाधव व कलावती उंबरे यांना स्वातंत्र्य सैनिकाची नेमप्लेट तसेच संजय नायगावकर व शीला पेंढारकर यांना ओळखपत्र देण्यात आले. तर विविध स्पर्धेचे पुरस्कार व गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.