मराठा आरक्षणासाठी पाडोळी, बोरगाव व कामेगावात नेत्यांना प्रवेश बंदी
मराठा आरक्षणासाठी पाडोळी, बोरगाव व कामेगावात नेत्यांना प्रवेश बंदी
धाराशिव दि.२३ (प्रतिनिधी) - चुलित गेले नेते आणि पक्ष मराठा आरक्षण एकच लक्ष्य असा नारा देत नारा मराठा आरक्षण मिळेपर्यंत आजी, माजी आमदार, खासदार व नेते मंडळी यांना धाराशिव तालुक्यातील पाडोळी (आ), बोरगाव (राजे) व कामेगाव येथे गाव प्रवेश बंदी करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्यावतीने घेण्यात आला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने मूक मोर्चे, धरणे आंदोलने, आमरण उपोषणे तर केलीच. शिवाय अनेक युवकांनी आत्महत्या केल्या आहेत. तर जालना जिल्ह्यातील जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण केले. त्यावेळी संपूर्ण राज्यातील मराठा समाजाचा पाठिंबा मिळाल्यामुळे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलन स्थळी येत महिन्याच्या नंतर आरक्षण दिले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच दि.१४ ऑक्टोबरला सकल मराठा समाजाचा आंतरवाली सराटी येथे प्रचंड मोठा मेळावा घेण्यात आला. मराठा समाजाला आश्वासन देऊनही अद्यापपर्यंत आरक्षण दिलेले नसल्यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड व तीव्र असंतोष खदखदत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे व आला आहे. त्याचाच भाग म्हणून धाराशिव तालुक्यातील पाडोळी (आ), बोरगाव (राजे) व कामेगाव या गावांनी नेत्यांना गाव बंदीचा निर्णय घेतला आहे. जर कोणी गावात येण्याचा प्रयत्न केला तर मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल. तसेच त्यांच्यासोबत घडलेल्या अनुचित प्रकारला स्वतः नेते मंडळी जबाबदार राहतील, असा इशारा दिला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही निवडणुक प्रक्रियेत मराठा समाजाने मतदान न करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे.