ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी
ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी
धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) - ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी श्री भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे या मागणीसाठी मुंबई येथे आझाद मैदानावर ब्राह्मण बांधव उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत तात्काळ आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे अशी मागणी धाराशिव येथील ब्राह्मण कल्याण ट्रस्टच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांच्या मार्फत एका निवेदनाद्वारे दि.२० ऑक्टोबर रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाच्या मागण्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. ब्राह्मण समाजातील विद्यार्थी, तरुणांनी चांगले शिक्षण घेऊनही त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागत आहे. त्यामुळे ब्राह्मण समाजाच्यावतीने श्री भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली जात आहे. या मागणीसाठी रामराम दिनकर जोशी व अनंत देविदास जोशी यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या मागणीची दखल घेऊन तात्काळ महामंडळ स्थापन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी गजानन घुगीकर, माधव रामदासी, धनंजय जेवळीकर, ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. अभय पाथरूडकर, पदाधिकारी संतोष बडवे, डॉ. गजानन कुलकर्णी, विपीन गंधोरकर, महेश पाठक, मुकुंद भातंब्रेकर, अजय नाईक, राकेश कुलकर्णी, अॅड.लक्ष्मीकांत कुलकर्णी, भाजपचे माजी नगरसेवक प्रवीण पाठक, सतीश देशमुख, गिरीष पानसरे आदी उपस्थित होते.