मृत्यूच्या ७५ वर्षानंतरही गांधींची एवढी भीती का वाटते ? केसकर
मृत्यूच्या ७५ वर्षानंतरही गांधींची एवढी भीती का वाटते ? केसकर
धाराशिव दि.१३ (प्रतिनिधी) - मागील वर्षभर आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतम होत्सव साजरा केला. हे वर्ष महात्मा गांधींच्या स्मृतींचे ७५ वे वर्ष आहे. आजपासून ७५ वर्षांपूर्वी ज्या महात्मा गांधींना गोळ्या घालून संपविण्यात आले. त्याच गांधींच्या प्रतिमेवर आजही काही माथेफिरू गोळ्या झाडत आहेत. मृत्यू नंतरही गांधींची यांना एवढी भीती का वाटते ? असा सवाल पत्रकार रवींद्र केसकर यांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलात गांधी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील, राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव रोहित बागल, युवकचे जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, पंकज भोसले, प्राचार्य गाजी शेख, सुरज वडवले, कुणाल कर्णवर, राष्ट्रवादीचे विद्यार्थी शहराध्यक्ष पृथ्वीराज मुळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना केसकर म्हणाले की, सध्या देशभरात टोकाची अराजकता पसरली आहे. ती संपवून सुशासन निर्माण करायचे असेल तर पुन्हा एकदा महात्मा गांधी यांच्या विचारांची गरज आहे. तर महात्मा गांधी यांनी जगाला शांतता व अहिंसेचा संदेश दिला त्या तत्त्वाचे पालन विद्यार्थी दशेत होणे गरजेचे आहे. ज्या वयात गांधीजी कळणे आवश्यक आहे. त्या वयातच राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हा कार्यक्रम घेतल्याबद्दलही त्यांनी आभारही मानले. वर्तमान स्थितीत माजलेली अराजकता पाहता आज खऱ्या अर्थाने या देशाला पुन्हा एकदा बापू समजून घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.