शेतकऱ्यानी बांबू लागवड अभियानामध्ये सहभाग नोंदवावा - कांबळे
धाराशिव दि.५ (प्रतिनिधी) - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजनेमधून शेतकऱ्यांच्या शेतावर, बांधावर व पडीक जमीनीवर बांबू लागवड अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उन्नती व समृद्धीसाठी जिल्हा प्रशासनाने नरेगा अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर २.५ हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचे दिृष्ट निर्गमित केले आहे. त्यामुळे दि.२५ ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक ग्रामपंचायत निहाय बांबू लागवडीसाठी इच्छूक शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी केले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत सलग शेतावार बांबू लागवडीसाठी तीन वर्षाच्या कालावधी मध्ये अकुशल व कुशल मिळून लागवड पुर्व कामे करण्यासाठी १ लाख ७९ हजार २७२ रुपये, प्रथम वर्षी २ लाख १४ हजार ६५३ रुपये, द्वितीय वर्षी १ लाख ४४ हजार २७४ रुपये व तृतीय वर्षी १ लाख ५१ हजार ८९० रुपये असे एकूण हेक्टरी ६ लाख ९० हजार ९० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. तसेच शेताच्या बांधावर बांबू लागवडीसाठी प्रत्येक १०० रोपे लागवडी करीता ५० हजार ६९५ रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू लागवड अभियांनामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन कांबळे यांनी केले आहे.