शेतकऱ्यांची अवहेलना मांडली पोतराजाच्या आसूडच्या वेशभूषेत
शेतकऱ्यांची अवहेलना मांडली पोतराजाच्या आसूडच्या वेशभूषेत
धाराशिव दि.१७ (प्रतिनिधी) - यंदा पाऊसमान अत्यल्प असल्यामुळे खरीप हंगामातील सर्व पिके वाया गेलेली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीमची रक्कम देण्यासह पिक विमा देण्यात यावा या इतर मागण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकार, केंद्र सरकार व पीक विमा कंपनी एकमेकांकडे बोट दाखवून शेतकऱ्यांची पिळवणूक करून शेतकऱ्यावर एक प्रकारे आसूड ओढीत आहेत. त्यामुळे पोतराजाच्या वेशभूषेत आसूड मारुन घेत प्रतीकात्मक आंदोलन दि.१७ ऑक्टोबर रोजी केले.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मदत निधी अर्थात एनडीआरएफच्या निकषानुसार दुष्काळ जाहीर करावा लागतो. तर दुष्काळ कालावधीत जनतेला अत्यावश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे सरकारवर बंधनकारकच नव्हे तर ते सरकारचे कर्तव्य असते. मात्र सरकारने अद्यापपर्यंत एक नुकसानीची अग्रीम रक्कम दिली नाही किंवा विमा रक्कम देखील दिलेली नाही. तसेच कुठलीच सोयीसुविधा देखील उपलब्ध करून दिलेली नाही. राज्य सरकार विमा कंपनीकडे बोट दाखवते. तर विमा कंपनी सरकारकडे बोट दाखवते. विशेष म्हणजे हे तिन्ही एकमेकांकडे बोट दाखवून शेतकऱ्यांना झुलवत ठेवून त्याची पिळवणूक करीत आहेत. त्यामुळे सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना अग्रीमची रक्कम द्यावी. पीक विमा, गतवर्षीचे अतिवृष्टीचे अनुदान रक्कम द्यावी. जिल्ह्यातील ५७ मंडळापैकी १७ मंडळांना अग्री न रकमेतून वगळले असून त्यांचा समावेश करण्यात यावा. तसेच संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकरी व सर्वसामान्यांना अत्यावश्यक असलेल्या सोयी सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात यासह इतर मागण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव, मयुर कावळे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले.