उर्जा विभागाने तुघलकी निर्णय घेऊ नयेआ. पाटील यांची फडणवीस यांच्याकडे मागणी
उर्जा विभागाने तुघलकी निर्णय घेऊ नये
आ. पाटील यांची फडणवीस यांच्याकडे मागणी
धाराशिव दि.१२ (प्रतिनिधी) - जिल्ह्यात नव्याने विभागीय कार्यालय मंजुर करण्याबाबत प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये येरमाळा, ईटकुर, दहिफळ व मोहा या ४ शाखा नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या परंडा विभागीय कार्यालयास संलग्न करणार असल्याने हे भौगोलिकदृष्टया अत्यंत गैरसोयीचे ठरणार आहे. कशामुळे असा मनमानी निर्णय घेण्यात येणार हे समजत नाही. सरकार असे तुघलकप्रमाणे का वागत आहे ? असा प्रश्न आ. कैलास पाटील यांनी सरकारला विचारला आहे.
येरमाळा ते धाराशिव अंतर ३४ किलो मीटर, ईटकुर ते धाराशिव अंतर ५८ किलो मीटर, दहिफळ ते धाराशिव अंतर ३७ किलो मीटर, मोहा ते धाराशिव अंतर ४० किलो मीटर नव्याने संलग्न करण्यात येणाऱ्या परंडा विभागीय कार्यालयाचे अंतर येरमाळा ते परंडा ५८ किलो मीटर व ईटकुर ते परंडा ८० किलो मीटर, दहिफळ ते परंडा ८३ किलो मीटर, मोहा ते परंडा अंतर ९० किलो मीटर आहे. ही शाखा कार्यालये परंडा प्रस्तावित विभागीय कार्यालयास जोडल्यास नागरीकांची, शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊन आर्थिक नुकसान होणार आहे. शिवाय कोणत्याच पध्दतीने संयुक्तीक ठरत नसताना असा अट्टाहास करुन सरकार असा तुघलकी निर्णय का घेतला जात आहे ? असा सवाल आ पाटील यांनी उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. तर कळंब तालुक्यातील येरमाळा येथे नव्याने उपविभाग तयार करुन येरमाळा, ईटकुर, मोहा, दहिफळ ही शाखा कार्यालये त्यांना संलग्न करावीत. तर येरमाळा उपविभाग धाराशिव विभागीय कार्यालयास संलग्न करण्याची मागणी परिसरातील नागरीकांनी केली आहे. तसेच जिल्ह्यात नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या विभागीय कार्यालयाशी संलग्न न करता येरमाळा येथे उपविभाग कार्यालय नव्याने तयार करुन ते धाराशिव विभागीय कार्यालयाशी संलग्न करण्याबाबत शासनाने निर्णय घ्यावा अशी मागणी आ पाटील यानी केली आहे.