वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न मिटला - आ. पाटील
वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न मिटला - आ.
पाटील
धाराशिव दि.२७ (प्रतिनिधी) - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न निर्णय झाल्यापासून जवळपास ३ वर्षांपासून प्रलंबित होता. यासाठी सातत्याने ठाकरे सरकारकडे पाठपुरावा करत होतो. मात्र याबाबत हालचाल होत नव्हती. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यावर वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासकीय आयटीआय व जलसंपदा विभागाची जागा देण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. आज दोन्ही विभागाच्या संमतीनंतर शासन आदेश निर्गमित झाला असल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे वैद्यकीय संकुल स्थापन करण्याच्या प्रक्रियेला आता गती मिळणार असल्याची माहिती आ राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यावर वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासकीय आयटीआय व जलसंपदा विभागाची जागा देण्यात यावी असा आग्रह त्यांनी धरला होता. ही जागा महामार्ग लगत असल्यामुळे रुग्णांची मोठी सोय होणार आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागेची पाहणी करुन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
आ पाटील यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांनी संभाजीनगर येथील बैठकीत ती जागा वैद्यकीय महाविद्यालयासाठी देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच दोन्ही विभागांना याबाबत सहमती देण्यासाठी सूचित केले होते. त्यावर दोन्ही विभागांनी तातडीने याबाबत सहमती दर्शविली असल्यामुळे आज याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला असून सुसज्ज असे वैद्यकीय महाविद्यालय, ४३० खाटांचे रुग्णालय व वैद्यकीय संकुल स्थापनेचा एक टप्पा पार पडला असल्याचे आ.पाटील यांनी सांगितले. तसेच
आता त्यांचे लक्ष शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाची सुसज्ज अशी इमारत उभी करणे हे असून यासाठी आवश्यक असणारा निधी व अनुषंगिक बाबींची पूर्तता करण्यासाठी त्यांचा शासन दरबारी पाठपुरावा चालूच राहणार आहे. विशेष म्हणजे राज्यातील महायुतीचे सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्यामुळे वैद्यकीय संकुल देखील लवकरच उभे राहील याची खात्री वाटत असल्याचे आ.पाटील यांनी सांगितले.