#Ranajagjitsinhpatil#पुढील आठवड्यात अग्रीम विमा मिळणार - आ. पाटील
धाराशिव दि.२८ (प्रतिनिधी) - पावसातील खंडामुळे सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानी पोटी अनुज्ञेय २५ टक्के अग्रीम रक्कम पुढील आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे. तर या माध्यमातून दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५ ते ६ हजार रुपये मिळणार असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
खरीप हंगामात पावसाने मोठा खंड दिल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. खरिपाची पिके नगदी उत्पन्न देणारी असल्यामुळे शेतकऱ्यांची अर्थ व्यवस्था मुख्यतः याच पिकांवर अवलंबून असते. महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह विमा प्रतिनिधी व शेतकरी यांच्या संयुक्त पाहणीमध्ये जिल्ह्यातील ४० महसुल मंडळात पावसातील खंडामुळे सोयाबीन पिकाचे ५० टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत अधिसुचना जारी केली होती. या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुढील आठवड्यात अग्रीम विमा रक्कम वितरित करण्यात येणार आहे. पिकांच्या नुकसानीची टक्केवारी पाहता हेक्टरी ५ ते ६ हजार रुपये मिळणे अभिप्रेत आहे. तसेच उर्वरित १७ महसूल मंडळातील पीक परिस्थितीचा अहवाल घेवून या मंडळाना देखील अग्रीम रक्कम देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. विमा कंपनीने यावर काही हरकती घेतल्या आहेत. मात्र प्रशासनाकडून त्या हरकतीचे निरसन करण्यात येत असून शासन स्तराहून देखील विमा कंपन्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मंडळांना देखील दिवाळी पूर्वी अग्रीम मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले आहे.