उर्वरित ५ तालुक्यांचा देखील लवकरच दुष्काळी तालुक्यात समावेश होणार - आ. पाटील
उर्वरित ५ तालुक्यांचा देखील लवकरच दुष्काळी तालुक्यात समावेश होणार - आ. पाटील
धाराशिव दि.१ (प्रतिनिधी) - शासनाच्या प्रचलित निकषानुसार जरी जिल्ह्यातील ३ तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झाला असला तरी जिल्ह्यातील अल्प पर्जन्यमान, घटलेली भूजल पातळी, खरिपाच्या उत्पन्नातील घट व रब्बी पेरणीची अनिश्चितता या बाबी विचारात घेऊन उर्वरित ५ तालुक्यांचा देखील दुष्काळी तालुक्यामध्ये समावेश करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आलेली असून त्यावर सकारात्मक कार्यवाही सुरू असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
जिल्ह्यात यावर्षी केवळ ७१ टक्केच पाऊस झाला असून धरणामध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. दुष्काळासाठी आवश्यक असलेले ट्रिगर १ व ट्रिगर २ हे केवळ धाराशिव, लोहारा व वाशी या ३ तालुक्यामध्ये पूर्ण झाले असल्याने या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. धरणातील अत्यल्प पाणी साठा व खरीप पिकांच्या उत्पन्नातील घटी मुळे पाणी व चारा टंचाई निर्माण होणार आहे.
त्यामुळे अल्प पर्जन्यमान, पावसातील खंडामुळे खरीप पिकांच्या उत्पन्नात झालेली घट व घटलेली भूजल पातळी, धरणातील अल्प पाणी साठा या बाबी विचारात घेवून उर्वरित पाच तालुक्यांचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उर्वरित तालुक्यांमध्ये देखील दुष्काळ जाहीर करण्याची विनंती केली होती.
या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर अहवाल शासनाकडे सादर केला असून प्राप्त प्रस्तावावर शासन स्तरावर सकारात्मक कार्यवाही सुरू आहे. लवकरच या ३ तालुक्याप्रमाणेच इतर ५ तालुक्यांचा देखील दुष्काळी तालुक्यात समावेश होईल असा विश्वास आ. पाटील यांनी व्यक्त केला आहे.