ज्वारी पीक विमा भरण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत
ज्वारी पीक विमा भरण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत
धाराशिव दि.८ (प्रतिनिधी) - रब्बी हंगामातील ज्वारी गहू व भुईमूग या पिकांचा विमा रक्कम भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. यामध्ये ज्वारीचा पीक विमा भरण्यासाठी दि.३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली आहे.
रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत शेतकरी नोंदणीसाठी राष्ट्रीय विमा संकेतस्थळ कार्यान्वित करण्याचे शासनाने निर्देश आहेत. चालू रब्बी हंगामात कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विम्याचा हप्ता भरण्याची अंतिम मुदत रब्बी ज्वारी बागायत व रब्बी ज्वारी जिरायत पिकासाठी ३० नोव्हेंबर तर गहू बागायत, हरभरा व रब्बी कांदा या पिकांसाठी १५ डिसेंबर तसेच उन्हाळी भुईमूग या पिकासाठी ३१ मार्च २०२४ ही आहे. पीक विमा योजना ही कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभाग घ्यावयाचा नसेल तर कर्ज घेतलेल्या अधिसुचित पिकांसाठी नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या ७ दिवस आधीपर्यंत संबंधित बँकेस विमा हप्ता कपात न करण्याचे घोषणापत्र देणे आवश्यक आहे. तर जे कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होण्यासाठी घोषणापत्र देणार नाहीत. त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा रब्बी हंगामासाठी १.५० टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादीत ठेवण्यात आला असला तरी सन २०२३-२४ पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी प्रती अर्ज केवळ १ रुपया भरुन पीक विमा पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे. तर शेतकरी हिस्यातील उर्वरीत पीक विमा हप्त्याची रक्कम राज्य शासन भरणार आहे.
तसेच शेतकऱ्यांना ज्या पिकाचा विमा उतरावयाचा आहे. ते पीक शेतात पेरल्याबद्दलचे स्वयंघोषणापत्र, ७/१२ उतारा, आधार कार्ड व बँक पासबुकच्या झेरॉक्स प्रतीसह नजीकच्या बँकेत अथवा आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्ता भरुन पीक संरक्षित करावे. त्यामुळे पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा. तसेच शेतकऱ्यांनी अधिक माहीतीसाठी PMFBY.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा किंवा नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन माने यांनी केले आहे.