एनआरएचएम आरोग्य कर्मचाऱ्यांचे नियमित समायोजन करण्याच्या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन
धाराशिव दि.६ (प्रतिनिधी) - राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना शासन सेवेत नियमित पदावर थेट समायोजन करण्यात यावे यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.६ नोव्हेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शहरी, ग्रामीण व एनयुएचएम अंतर्गत कार्यरत तसेच एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांना वयाची अट शिथिल करून नियमित रिक्त पदावर समायोजन करण्यासाठी धोरणात्मक निर्णय त्वरित घेण्यात यावा. तांत्रिक व अ तांत्रिक पदावर कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवा प्रवेश नियम त्वरित तयार करून तात्काळ सेवा समायोजन करण्यात यावे. ज्या तांत्रिक व अ तांत्रिक पदांचे सेवा प्रवेश नियम तयार आहेत. त्या पदांचे प्रथम टप्प्यात सार्वजनिक आरोग्य विभाग व ग्रामविकास विभागाच्या आरोग्य विभागातील मंजूर रिक्त पदावर थेट सेवा समायोजन करण्यात यावे. कर्मचाऱ्यांचे सेवा समायोजन होईपर्यंत समान काम समान वेतन धोरण लागू करण्यात यावे. कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना एचआर पॉलिसी त्वरित लागू करण्यात यावी. एन एच एम अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईपीएफ योजनेचा लाभ देण्यात यावा. कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईएसआयसी योजनेचा लाभ देण्यात यावा व त्वरित लागू करण्यात यावा. अधिकारी व कर्मचाऱ्यांना 2018 मध्ये वेतन सुसूत्रीकरणात जुन्या कर्मचारी व अधिकारी यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांना कुठल्याच प्रकारची वेतन वाढ करण्यात आलेली नाही अशा सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्वरित २०१७ पासून वेतन सुसूत्रीकरणाचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने देण्यात यावा. तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासकीय नियमाप्रमाणे अर्जित रजा व वैद्यकीय रजेचा लाभ देण्यात यावा या मागण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात जिल्हास्तरीय समन्वय कृती समितीचे डॉ विलास तोडकर, डॉ किशोर गवळी, डॉ विलास बोचरे, डॉ शरद दशरथ, डॉ पंकज शिनगारे, डॉ किरण बारकुल, डॉ अश्विनी हलसे, डॉ. ऋतुजा म्हेत्रे, जीवन कुलकर्णी, डॉ किरण तानवडे, डॉ सतिश गिरी, डॉ पल्लवी कोथळकर, मनिषा साळुंके, शर्मिला ठवरे, संतोष पोतदार, महेश देशमुख, अतुल पौळ, पवन राठोड, रोडगे आदींसह कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
...............................
कधी देता भाषण, कधी देता आश्वासन...आता तरी सांगा कधी करता १०९ टक्के समायोजन... समायोजन आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बापाचे.... नको नुसत्या थापा, समायोजन करा बापा... समान काम, समान वेतन एकच मिशन १०० टक्के समायोजन....गरज सरो, वैद्य मरो...कोविड आदी लक्ष वेधून घेणारे फलक या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. तसेच याच प्रकारच्या घोषणा देखील यावेळी देण्यात आल्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.