जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार १६१ कोटी ८० लाख अग्रीम पीक विम्याची रक्कम - आ. पाटील उर्वरित १७ महसूल मंडळासाठी प्रयत्न सुरु
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार १६१ कोटी ८० लाख अग्रीम पीक विम्याची रक्कम - आ. पाटील
उर्वरित १७ महसूल मंडळासाठी प्रयत्न सुरु
धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) - पावसातील खंडामुळे सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी अग्रीम पीक विमा रक्कम वितरणास सुरुवात झाली आहे. तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १६१ कोटी ८० लाख रुपये वितरित करण्यात येत आहेत. तसेच उर्वरित १७ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना देखील दिवाळीपूर्वी अग्रीम पीक विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती आ राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
पावसातील खंडामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ४० महसूल मंडळाला अग्रीम पीक विमा वितरित करण्यात येत आहे. झालेल्या निकसानीपोटी शेतकऱ्यांना हेक्टरी जवळपास ५ हजार रुपये वितरित करण्यात येत आहेत. तसेच धाराशिव तालुक्यासाठी ४८ कोटी ५९ लाख रुपये, तुळजापूर तालुक्यासाठी ४० कोटी ८७ लाख रुपये, कळंब तालुक्यासाठी १७ कोटी १३ लाख रुपये, भूम तालुक्यासाठी ४ कोटी १६ लाख रुपये, लोहारा तालुक्यासाठी १६ कोटी ३९ लाख रुपये, परंडा तालुक्यासाठी ४ कोटी ७ लाख रुपये, उमरगा तालुक्यासाठी २५ कोटी ५३ लाख रुपये व वाशी तालुक्यासाठी ७ कोटी ३ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहेत.
अग्रीम नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होते. राज्य सरकारने देखील विमा कंपन्यांना त्या अनुषंगाने सूचना दिल्या होत्या. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मिळत असलेल्या रकमेमुळे शेतकऱ्यांना नक्कीच काहीसा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.